
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधामधील किराना हिल्सवर हल्ला केला होता का? यावर आता भारताचे माजी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने किराना हिल्स किंवा तिथल्या कुठल्याही अणवस्त्र ठिकाणाला लक्ष्य करुन कोणताही हल्ला केला नव्हता असं चौहान यांनी खुलासा केला आहे. सरगोधामध्ये भारताने अनेक ड्रोन्स पाठवले होते. त्यातल्या एका ड्रोनला कदाचित आपलं टार्गेट मिळालं नाही. म्हणून ते ड्रोन किराना हिल्सच्या डोंगराला धडकलं असेल असं खुलासा अनिल चौहान यांनी केला. विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी सीडीएस अनिल चौहान सहभागी झाले होते. “हल्ला करण्याआधी आम्ही सरगोधा आणि किराना हिल्सच्या दिशेने अनेक लॉयटरिंग म्यूनिशन ड्रोन्स पाठवले होते. त्यांचं मुख्य काम सरगोधाच्या आसपास असलेले पाकिस्तानी रडार सिस्टिम्स शोधून उद्धवस्त करण होतं” असं चौहान म्हणाले.
“म्यूनिशन म्हणजे ड्रोन जवळपास दोन तास हवेत राहून टार्गेटचा शोध घेऊ शकते. ठरलेल्या वेळेत टार्गेट मिळालं नाही, तर ते खाली कोसळतात. कदाचित यापैकीच एक ड्रोन किराना हिल्सच्या डोंगराला धडकलं असेल. पाकिस्तानी मीडियामध्ये किराना हिल्सच्या डोंगरातून धुर येत असल्याचे फोटो दाखवले जात होते. त्यामागे हे कारण असू शकतं” असं अनिल चौहान म्हणाले.
घुसून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी पाकिस्तानी सरगोधामध्ये ड्रोन्स पाठवणं हा भारताच्या सैन्य रणनितीचा हिस्सा होता. जनरल चौहान यांनी याला तिसरा पर्याय ठरवला. उरीच्यावेळी भारताने सर्जिकल स्ट्राइक म्हणजे जमिनी कारवाई केली होती. पुलवामानंतर पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपली ड्रोन शक्ती पाकिस्तानला दाखवून दिली. पाकिस्तानने भारतावर डागलेले अनेक ड्रोन्स भारताने मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमुळे हवेतच नष्ट केले. पण पाकिस्तानला मात्र भारताचं एकही ड्रोन रोखता आलं नाही. भारताने पाकिस्तानात घुसून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली. शत्रुला आश्चर्याचा धक्का देऊन यश सुनिश्चित करणं ही भारताची रणनिती होती.
मी होकारचं दिला
माजी CDS ने अजून एक खुलासा केला. पाकिस्तानने जेव्हा चर्चेची विनंती केली, तेव्हा सुद्धा भारताने पाकिस्तानी सैन्य तळांवर हल्ल्याला मंजुरी दिली होती. जनरल चौहान म्हणाले की, “पाकिस्तानने सकाळी 10 च्या सुमारास फोन करुन चर्चेचा प्रस्ताव दिला. त्यावेळी एअरफोर्स प्रमुखांनी मला विचारलं की, सरगोधावर हल्ला केला पाहिजे का? त्यावर मी होकारार्थी उत्तर दिलं”
Leave a Reply