
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने लासलगाव आणि पिंपळगावातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सध्या पिंपळगावात कांद्याला ६,६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे, तर लासलगावात ५,००० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी भाव नोंदवला गेला आहे.
मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभावात ही वाढ झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईपर्यंत हे दर चढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे देशांतर्गत शहरी भागातील ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधून दिल्ली, चेन्नई यासह विविध शहरांमध्ये ४,३५० मेट्रिक टन कांदा पाठवण्यात आलेला आहे. सरकारने १ लाख २१ हजार मेट्रिक टन कांदा १,२३५ रुपयांपासून २,३४५ रुपयांपर्यंतच्या दराने खरेदी केला आहे. हा कांदा शहरी भागातील नागरिकांना ३५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे. किरकोळ बाजारातील कांद्याच्या वाढलेल्या दरापासून शहरी भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
Leave a Reply