
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर निशाणा साधला. आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्यांच्या पोटातून मंत्री तयार होत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. तर अनेक राजकीय पक्षांमध्ये जातीचे सेल तयार केले जात आहेत, त्यावरही त्यांनी चिंता व्यक्त करत ते काहीही उपयोगाचे नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी राजकीय घराणेशाहीवर त्यांनी तोंडसूख घेतले.
घराणेशाहीवर गडकरींचे तोंडसुख
सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या षट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्यांच्या पोटातून मंत्री तयार होतो, ही प्रथा बंद करण्याची मागणी त्यांनी व्यक्त केली. याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. पण समाजसुधारकांच्या जीवनातून समाजसुधारक तयार झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. आई-वडिलांच्या पुण्याईवर नाही तर स्वकर्तृत्वाने चमकले पाहिजे. बाबा आमटे थोर होते, तेवढंच काम विकास आणि प्रकाश आमटे यांनी केल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राजकारणी हा आपल्या पुढील निवडणुकीचा विचार करतो. तर सामाजिक आणि आर्थिक सुधारक हा शतकानुशतकांचा विचार करतो. जर तुम्ही उत्तम सामाजिक काम केलं तर तुम्हाला पोस्टर लावायची गरज नाही. कटआऊट लावायची गरज नाही. तुम्हाला लोकांकडे जाऊन मतं मागण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
देशात 5 कोटी नवीन रोजगार
सीआयआय-आयटीसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला. 2030 सालापर्यंत भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल असे दावा त्यांनी केला. तर या कालावधीत देशात 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. सध्या भारतात 57 लाख नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनं आहेत. एकूण बाजारपेठेत हे प्रमाण 7 टक्के इतके आहे. जेव्हा आपण वाहतूक मंत्री म्हणून या मंत्रालयाचा कारभार स्वीकारला. तेव्हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार हा 14 लाख कोटी रुपये इतका होता. आता तो वाढून 22 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचल्याची माहिती त्यांनी दिली.
Leave a Reply