
देशाच्या लोकशाहीत महिलांच्या वाढत्या सहभागाची हत्या झाली असून त्याचे खरे हत्यारे हे विरोधी पक्ष आहेत, अशा अत्यंत तीव्र शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या प्रयत्नांना विरोधकांनी खोडा घातल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. ही कृती म्हणजे भारताच्या नारीशक्तीचा घोर अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जगातील अनेक मोठ्या लोकशाही राष्ट्रांमध्ये महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे. मात्र, भारतात तो वाढू नये, असाच प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने होत आहे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्याची जेव्हा जेव्हा वेळ येते, तेव्हा विरोधकांमधील पुरुषी आणि प्रतिगामी मानसिकता उघड होते. केवळ राजकीय स्वार्थापोटी त्यांनी यावेळेही महिला आरक्षणाला खिळ घातली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जर हे आरक्षण वेळेवर मार्गी लागले असते, तर त्याचा सकारात्मक परिणाम अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (ST) प्रतिनिधित्वावरही झाला असता. महिलांच्या जागा वाढल्या असत्या, तर त्यासोबतच या वंचित घटकांच्या जागांमध्येही मोठी वाढ झाली असती. मात्र, विरोधकांनी या वाढीवरही कुऱ्हाड चालवली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
आज आपल्या संसदेत केवळ ७३ महिला आहेत. जर विरोधकांनी सकारात्मक भूमिका घेतली असती, तर ही संख्या २७३ वर पोहोचली असती. २७३ महिला संसदेत गेल्या असत्या तर देशाच्या धोरणनिर्मितीत महिलांचे स्थान अधिक बळकट झाले असते. पण काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी नेहमीच महिलाविरोधी धोरणे राबवण्याची आपली प्रवृत्ती जोपासली आहे, अशीही टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply