
मुंब्रा येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईविरोधात एमआयएम पक्षाने ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर पोहोचला.
पाऊस पडत असतानाही मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. यासोबतच पाणी चोरीच्या घटनांमुळेही नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आणि लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
मोर्चादरम्यान, आंदोलकांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी महानगरपालिकेला जाब विचारला की, चांगला पाऊस पडत असतानाही पाणीटंचाई का आहे आणि जलसंधारणाचा (वॉटर हार्वेस्टिंग) वापर का केला जात नाही. मुंब्रामधील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सहर शेख यांनी केली. या आंदोलनामुळे ठाणे महानगरपालिकेसमोर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
Leave a Reply