
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना जात वैधता दिली जात नाहीये. जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाहीये, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे सडकून टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी बावनकुळे मराठा समाजाची प्रमाणपत्रं रद्द करत आहेत. त्यांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याशिवाय ते व्यवस्थित होणार नाहीत, अशी टीका जरांगे यांनी केली. तसेच त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. मराठ्यांनी एकजूट व्हावे, असे जरांगे म्हणाले आहेत.
मराठ्यांनी आतापासून सावध होणं गरजेचं
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केले. यावेळी बोलताना आम्ही जन्म फक्त अन्याय सहन करण्यासाठी घेतलेला नाही. त्यांची मग्रुरी आता मी संपवणार आहे. भविष्यात हाल होऊ नये म्हणून मराठ्यांनी आतापासून सावध होणं गरजेचं आहे. मी समाजाच्या लेकरांसाठी सरकारचा वैरी झालो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील असं का वागत आहे ते कळत नाही. ज्यांनी चूक केली, त्यांचेच मी नाव घेणार, असे मनोज जरांगे म्हणाले.
बावनकुळे मराठा समाजाची जात प्रमाणपत्रं…
पुढे बोलताना जरांगे यांच्यावर टीका केली. मराठा समाजाच्या नेत्यांचे रक्त एवढे थंड कसे आहे. मराठा समाजाच्या डोळ्यासमोर बावनकुळे मराठा समाजाची जात प्रमाणपत्रं रद्द करत आहेत. बावनकुळे यांना जनावरचे इंजेकशन दिल्याशिवाय ते ताळ्यावर येणार नाहीत, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला. तसेच आधी जात नंतर पक्ष. यांना 58 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाही. मराठा समाजात गैरसमज पसरवला जात आहे. 4 प्रमाणपत्र रद्द केले आहेत, असेही जरांगे म्हणाले.
माझं शरीर आता मला साथ देत नाहीये
मी बावनकुळे यांच्या मागे लागलो तर खूप अवघड होईल. बावनकुळे तू इतका पापी वागू नको. तू आमचा नाद करू नको. तू ज्या कुळात आहे ते कुळच नाही. आम्ही 96 कुळी आहोत, अशी एकेरी टीका मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर केली. पुढे बोलताना मराठा समाजाला एकजूट होण्याचेही आवाहन केले. ‘मराठ्यांनो पुढच्या काळ्यात एकजूट रहा. सर्वांची जबाबदारी आहे. वेळीच सावध व्हा. हातातोंडाशी आलेला घास बावनकुळे यांनी हिसकावला आहे. समाजापेक्षा मोठं कोणीही नाही. आपण आता या वेळेस पूर्ण तयारी केली, कधी काळी मी असेल किंवा नसेल. पण तुम्ही जबाबदारी घ्या. कारण माझं शरीर आता मला साथ देत नाहीये. समाजाच्या पाठीशी उभे राहत जा. सारखे उपोषण करून मला चालण्याचा आणि झोपण्याचा त्रास होत आहे, अशी माहिती देत माझी प्रकृती मला साथ देत नसल्याचे जरांगे मराठा बांधवांना म्हणाले.
Leave a Reply