
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन मुंबईकडे वळवण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले होते. सध्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन पुढील काळात मुंबईत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांना लवकरच पुढील नियोजनाची तारीख कळवण्यात येणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना सणासुदीच्या काळात आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते.
जरांगे पाटलांनी पूर्वी मुंबईत न येण्याचे आश्वासन दिल्याचे लाड यांनी म्हटले आहे. मात्र, सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला असून, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. जुन्या अध्यादेशाची अंमलबजावणी अजूनही न झाल्याने जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
Leave a Reply