
झारखंडमधील परीक्षा घोटाळ्याच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलन पेटल्याचे समोर येत आहे. विधानभवनावर घेराव मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर झारखंड सरकारविरोधात वातावरण तापलं आहे. भाजपने या लाठीचार्जचा निषेध करत झारखंड बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जवळपास 3000 पोलीस तैनात केले आहेत. भाजपने बंदची हाक दिल्यानंतर जागोजागी पोलीस फौजफाटा पाहायला मिळत आहे.
भाजपने दिली झारखंड बंदची हाक
भाजपने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर रांची पोलिसांनी नजर ही जयपाल सिंह स्टेडियमवरील गर्दीवर असणार आहे. भाजपच्या घोषणेमुळे वातावरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जयपाल स्टेडियम ते विधानभवनापर्यंत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील सुरक्षेसाठी मैदानात उतरले आहेत.
भारत बंददरम्यान सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी रांचीचे पोलीस अधिकारी राकेश रंजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. कुठेही गर्दी जमू नये, याचेही निर्देश देण्यात आलेत. संपूर्ण झारखंडवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर करण्यात येणार आहे. राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलिसांनी सर्व राजकीय पक्ष, आंदोलक विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
तत्पूर्वी, झारखंड लोक सेवा आयोग, झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार आढळून आला आहे. या परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काल विद्यार्थ्यांनी विधानसभेल घेराव घातला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले होते. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी 6 बॅरिकेट्स हटवून विधानभवनाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आधी पाण्याचा मारा केला. त्यानंतरही प्रयत्नांना यश आले. परंतु पोलिसांनी पाण्याचा मारा केल्यानंतर विद्यार्थी आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये पोलीस आणि आंदोलक हे दोघेही जखमी झाल्याचे दिसून आले.
Leave a Reply