
IND vs SL Test Series: भारताने श्रीलंका विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र, कोलंबो येथे झालेली दुसरी कसोटी नाट्यमयरित्या अनिर्णित राहिली. फॉलो-ऑन खेळूनही, सोनल दिनुशाच्या नाबाद १३३ धावांच्या जोरावर श्रीलंकेने सामना वाचवला आणि भारताला क्लीन स्वीप करण्यापासून रोखले. संपूर्ण मालिकेत फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले पण एका व्यक्तीवर सर्वात मोठा अन्याय झाला.
पडिक्कलने चार डावांमध्ये १०९.३३ च्या प्रभावी सरासरीने ३२८ धावा केल्या, ज्यात दोन उत्कृष्ट शतकांचा समावेश आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीतील अनिर्णित निकालावर पडिक्कलने निराशा व्यक्त केली आणि सांगितले की, जर संघाने सामना जिंकून मालिका २-० ने जिंकली असती, तर मला अधिक आनंद झाला असता.”
दुसरीकडे, युवा भारतीय फिरकी गोलंदाज मानव सुथारची या मालिकेतील कामगिरीही तितकीच प्रभावी होती. पडिक्कलऐवजी मानव सुथारला मालिकावीर म्हणून घोषित केले असते, तर त्यात आश्चर्य वाटले नसते. सुथारने संपूर्ण मालिकेत आपल्या फिरकीची जादू दाखवत एकूण १६ बळी घेतले. पहिल्या कसोटीत गॉलच्या खेळपट्टीवर त्याने भेदक गोलंदाजी करत सामन्यात १० बळी घेतले (पहिल्या डावात ४/७६ आणि दुसऱ्या डावात ६/५५), आणि भारताच्या १६५ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुसऱ्या कसोटीच्या सपाट खेळपट्टीवरही सुथारची प्रभावी कामगिरी कायम राहिली, त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ बळी घेत सामन्यात एकूण ६ बळी मिळवले. एकीकडे पडिक्कलने फलंदाजीने भारतीय संघासाठी मजबूत पाया रचला, तर दुसरीकडे मानव सुथारने गोलंदाजीने विरोधी फलंदाजांवर सतत दबाव कायम ठेवला. दोन्ही खेळाडूंची कामगिरी इतकी प्रभावी होती की, सुथारही पडिक्कलइतकाच मालिकावीर पुरस्कारासाठी पात्र वाटत होता. भारतीय संघाने आता श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने मात्र मानव सुथारचे भरपूर कौतुक केले.
Leave a Reply