
मुंबई, उपनगर परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईची धांदल उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.
राज्य सरकारच्या हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार मुंबईवर पावसाचे अजूनही सावट कायम आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी शेतातील काम करावे. चाकरमान्यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुंबईसाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत.




Leave a Reply