
राज्यात सध्या कांद्याच्या घसरत्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा ‘क्रांती मोर्चा’ काढला. या आंदोलनानंतर राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आलं असून कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
चांदवड येथे झालेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “कांद्याचा विषय अत्यंत गंभीर आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. काही आंदोलने राजकीय हेतूने प्रेरित असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे.”
महाजन यांनी सांगितलं की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्या नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हायव्होल्टेज बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हमीभाव, अनुदान आणि बाजारपेठेतील घसरते दर यांसारखे सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, जयकुमार रावळ यांच्यासह इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. “या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच ठोस निर्णय घेतला जाईल,” असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
Leave a Reply