
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आज सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते.
विरोधी पक्षातील आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. “मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच जनतेच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अनुपस्थित मंत्र्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असे सांगितले. “दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना जाब विचारला जाईल,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांच्या या वक्तव्यानंतर आता संबंधित मंत्र्यांवर काय कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply