
मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे आज सकाळपासुनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वरळी, हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोस्टल रोडवर एका वाहनाचा अपघात झाला असून त्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
वाहतूक कोंडीमुळे कार्यालयीन वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला असून अनेक वाहनचालकांना रस्त्यातच थांबावे लागत आहे. परिणामी, प्रवाशांना वेळेचा फटका बसत आहे.
दरम्यान, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Leave a Reply