
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे सध्या त्यांच्या विधानसभेतील भाषणामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. भाषण संपताना त्यांनी केलेल्या लहानशा कृतीवर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ही क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. विजय यांनी राजकारणात सिनेमाचा ‘टच’ आणल्याचा विनोद काहींनी केला, तर काहींनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाचं कौतुक केलं. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं विजय यांच्या भाषणाचे काही क्लिप्स एकस (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
या भाषणादरम्यान विजय यांनी त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाला अनेकदा ‘अभिनेत्यांचा पक्ष’ म्हणणाऱ्या टीकाकारांनाही प्रत्युत्तर दिलं. आपलं भाषण संपवण्यापूर्वी त्यांनी अध्यक्षांची परवानही घेतली आणि त्यानंतर चित्रपटातील सीनसारखी एक नाट्यमय हाताची खूण करून सर्वांचं लक्ष वेधलं. त्यावर विधानसभेच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आपल्या भाषणात विजय यांनी चित्रपटाच्या सेटवरून थेट राजकारणात आल्याच्या आरोपांवरही उत्तर दिलं.
विजय यांच्या भाषणाचा व्हिडीओ-
#WATCH | Chennai: Tamil Nadu Chief Minister C Joseph Vijay seeks permission from the Speaker and performs a cinematic gesture as he concludes his speech in the State Assembly.
(Video source: Tamil Nadu State Assembly) pic.twitter.com/Y7BlOXHkYI
— ANI (@ANI) June 23, 2026
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले. “काही लोक म्हणतात की मी थेट चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून मुख्यमंत्री बनलो. त्यांच्याच भाषेत मी म्हणेन की, ते फक्त एक ‘रील’ आहे.” विजय यांनी त्यांच्या पक्षाची सुरुवात कशी झाली याविषयी सांगितलं आणि म्हणाले, नेहमीच्या राजकीय मार्गांचा अवलंब करण्याऐवजी त्यांनी लोकांशी नातं जोडून हा पक्ष उभारला आहे. याविषयी ते पुढे म्हणाले, “बहुतेक लोक आधी राजकीय पक्ष सुरू करतात आणि मग लोकांकडे जातात. आम्ही आधी लोकांकडे गेलो आणि त्यानंतर आमचा पक्ष सुरू केला. ज्यांना ही गोष्ट समजत नाही, तेच आम्हाला केवळ एक अभिनेत्याचा पक्ष म्हणून हिणवतात. आम्ही कोणत्याही आघाडीशिवाय ही निवडणूक लढवली.”
या भाषणात विजय यांनी करूरमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचाही उल्लेख केला आणि त्यांच्या पक्षावरील दोषारोपांवर प्रश्न उपस्थित केले. टीव्हीकेचा बचाव करताना विजय म्हणाले, “करूरमध्ये 41 जणांनी आपले प्राण गमावले आणि त्याचा दोष आमच्यावर टाकण्यात आला. राजकारण असं करायचं असतं का?” त्यानंतर विजय यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांचा उल्लेख केला. “2011 मध्ये आम्ही मासेमाऱ्यांच्या समर्थनार्थ एक जाहीर सभा आयोजित केली. आम्ही जलीकट्टू आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहन दिलं. या सर्व कामांनंतर आम्ही टीव्हीके सुरू केलं. आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणारी निवेदनेही जारी केली होती”, असं ते भाषणात म्हणाले.
Leave a Reply