
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा केली जाते. मात्र, गणेश चतुर्थीशी संबंधित अशी एक प्राचीन धार्मिक मान्यता आहे, ज्याची चर्चा आजही होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं टाळावं, असं शास्त्रांमध्ये सांगितलं जातं.
या दिवशी चंद्र पाहिल्यास व्यक्तीवर ‘मिथ्या कलंक’ म्हणजेच खोटा आरोप येऊ शकतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या मान्यतेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा भगवान गणेश आपल्या वाहनावरून म्हणजेच मूषकावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या रूपाची चंद्रदेवाने थट्टा केली.
गणपतीला चंद्राची ही कृती आवडली नाही. त्यामुळे त्यांनी चंद्राला शाप दिला की, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल, त्याला खोट्या आरोपाला किंवा कलंकाला सामोरं जावं लागू शकतं. पुढे चंद्राने गणपतीची क्षमा मागितल्यानंतर या शापाचा प्रभाव विशिष्ट दिवसापुरता मर्यादित झाल्याचं मानलं जातं.
याच कारणामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन न करण्याची परंपरा रूढ झाली. पद्म पुराण आणि स्कंद पुराणातही या श्रद्धेचा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. गणेश चतुर्थीच्या दिवशी नकळत चंद्र दिसला तर घाबरण्याची गरज नाही, असं धार्मिक परंपरेत मानलं जातं. अशावेळी काही उपाय केले जातात.
स्यमंतक मणीच्या कथेशी संबंधित मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. ‘सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः॥’ या श्लोकाचा जप करण्याचा उल्लेख आढळतो. याशिवाय गणपतीची भक्तिभावाने पूजा करून दुर्वा, मोदक आणि लाडू अर्पण करावेत, गणेश गायत्री मंत्राचा जप करावा आणि गणरायाची क्षमा मागावी, अशीही धार्मिक मान्यता आहे. (टीप: वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक तथ्य किंवा वैद्यकीय/वैज्ञानिक उपाय म्हणून पाहू नये.)




Leave a Reply