
वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या विजयासह जुन्या हिशोबाची परतफेड केली. तसेच 4 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडत 1-0 अशी आघाडीही मिळवली. हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात हा विजयी धमाका केला. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने विजयात दिलेल्या बहुमुल्य योगदानासाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाची बॅटिंग
इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. महिला ब्रिगेडची अत्यंत वाईट सुरुवात झाली. स्मृती मंधाना डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाली. तर शफाली वर्मा याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे 1 ओव्हरनंतर 2 आऊट 7 रन्स अशी स्थिती झाली.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
त्यानंतर यास्तिका भाटीया आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी कमाल केली. यास्तिका आणि जेमिमाह या दोघींनी शतकी भागीदारी केली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 76 बॉलमध्ये 126 रन्सची पार्टनरशीप करुन टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. या दरम्यान दोघींनी वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. मात्र दोघी आऊट झाल्यानंतर दीप्ती शर्मा हीचा अपवाद वगळता लोअर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना काही करता आलं नाही.
जेमीमाहने 40 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 1 फोरसह 69 रन्स केल्या. तर यास्तिका भाटीया हीने 40 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारसह 54 धावांतं योगदान दिलं. तर दीप्तीने 22 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडसाठी लॉरेन बेल हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
इंग्लंडची बॅटिंग
इंग्लंडसाठी एमी जोन्स व्यतिरिक्त एकूण चौघींना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र त्यांना भारतीय गोलंदाजांपुढे तग धरता आला नाही. टीम इंडियासाठी डेब्युटंट नंदीनी शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. क्रांती गौड हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
इंग्लंडचा 14 वर्षांनंतर हिशोब
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडचा 14 वर्षांनी हिशोब केला. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाचा चेम्सफोर्डमधील काउंटी ग्राउंडमध्ये पराभव केला होता. भारताने त्यानंतर आता 2026 साली मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंडला पराभूत करुन बरोबरी केली.
Leave a Reply