
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षावर लोकशाहीचा मुडदा पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पंतप्रधानांवर देशात आणि परदेशातही सातत्याने आरोप करणे, ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका नसल्याचे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली असून, अनेक देशांकडून त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, ही प्रगती विरोधकांना पाहावत नाही, अशी टीका त्यांनी केली.
शिंदे यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील कृतींवरही जोरदार हल्ला चढवला. १९६७ ते १९७१ या चार वर्षांत काँग्रेसने तब्बल ४५ सरकारे पाडली आणि १६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच, १८०० आमदार फोडून ११५ जणांना मंत्रिपदे दिली, असे आकडेवारीसह त्यांनी सांगितले. काँग्रेसने वेळोवेळी लोकशाहीचा गळा घोटला असून, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कारभाराकडे पाहण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे नमूद केले. विरोधकांनी रचनात्मक चर्चा करण्याऐवजी पळवाट शोधल्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती त्यांना वाटते, असेही ते म्हणाले.
Leave a Reply