
आज 15 ऑगस्ट… देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भारताच्या गेल्या 80 वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला. गेल्या 80 वर्षांत भारताने केलेली प्रगती ही अनेकांना थक्क करून सोडणारी आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारताने जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत केलेली वाटचाल विलक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील तब्बल 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारताला यश आलं, ही सर्वांसाठी समाधानाची बाब असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
भारत आता विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. विकसित भारत ही केवळ मोठी किंवा विकसित अर्थव्यवस्था उभारण्याची संकल्पना नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणं, सर्वांची उन्नती आणि प्रगती साधणं आणि सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणं, हीच विकसित भारताची खरी संकल्पना असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन
या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून देशाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि भारतीय संविधानाची मूल्यं यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र सातत्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात असून, विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply