
देशभरात कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. सरकार आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींची भेटून चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रातही उडाला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येने तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलेब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहे. या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोठं भाष्य केलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांचा दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत ‘युगानुकूलत्व मातृत्व’ कार्यक्रमात विद्यार्थी आंदोलनावर मोठं भाष्य केलं. मोहन भागवत यांनी म्हटलं की, ‘युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे. आपण प्रश्न विचारत नव्हतो. आताचं युग वेगळं आहे. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे. त्यांना आदेश देता येणार नाही. नवीन पिढी विश्लेषण करत असते. त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल’. ‘आधीच्या काळात आज्ञांचं पालन करण्याचा काळ होता. आई-वडिलांनी जे म्हटलं, त्यावर कोणतीही चर्चा होत नव्हती. त्यांचा आदेशानंतर शांत राहावं लागत होतं. त्यांच्यावर विश्वास होता. आपला त्यांच्या अनुभवावर विश्वास होता, असे ते म्हणाले.
भागवत पुढे म्हणाले, ‘आता काळ आधीसारखा राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज भासते. त्यांना वेळ देणे आणि संवाद करण्याची गरज आहे. आता कुटुंबात संवाद होत नाही. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो. घरात कोणी भेटायला आलं असेल, तरी त्याची कोणालाच माहिती नसते. हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बोलणे होईल. कुटुंबात संवाद झाल्यास मुले मोकळणेपणाने बोलतील, असेही मोहन भागवत यांनी सांगितले. ‘बाळाचं पालनपोषण 12 वर्षांपर्यंत हातात असतं. आपण जे काही सांगतो, त्यावर स्वत: कृती केली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही थेट सांगितल्यास स्वीकारणार नाही. कारण ते आधी विश्लेषण करत असतात, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply