
90 च्या दशकातील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. मात्र ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यश चोप्रा निर्मित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक आयकॉनिक आणि क्लासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणी देखील प्रचंड गाजली होती.
या चित्रपटाशी संबंधित अनेक रंजक किस्से आहेत. त्यापैकीच एक किस्सा ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या लोकप्रिय गाण्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, हे गाणं अंतिम स्वरूपात येण्यापूर्वी दिग्दर्शक आदित्य चोप्रांनी तब्बल 24 वेळा नाकारलं होतं.
गाणं 24 वेळा का नाकारलं?
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’साठी सर्वप्रथम रेकॉर्ड करण्यात आलेल्या गाण्यांपैकी ‘मेरे ख्वाबों में जो आए’ हे एक गाणं होतं. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले होते. मात्र सुरुवातीला गाण्याच्या शब्दांमध्ये आपल्या चित्रपटाला अपेक्षित असलेली भावना आणि ‘फील’ दिसत नसल्याचं आदित्य चोप्रांना वाटलं.
त्यामुळे त्यांनी गाण्यात वारंवार बदल सुचवले. एक-दोन नाही तर तब्बल 24 वेळा गाण्याचे बोल नाकारण्यात आले. प्रत्येक वेळी आनंद बक्षी यांनी संयमाने गाण्यात सुधारणा केली. अखेर 24 वेळा बदल केल्यानंतर आदित्य चोप्रा यांना गाणं पसंत पडलं आणि ते अंतिम स्वरूपात आलं.
लता मंगेशकरांच्या आवाजाने मिळाली खास ओळख
या गाण्याला जतिन-ललित यांनी संगीत दिलं असून, दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने ते अजरामर केलं. गाण्याची चाल, शब्द आणि लता मंगेशकरांचा मधुर आवाज यामुळे ‘मेरे ख्वाबों में जो आए’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहिलं.
चित्रपटातील प्रसंगाशी अगदी योग्य प्रकारे जुळणारं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यामुळेच 24 वेळा नाकारलं गेलेलं हे गाणं पुढे ‘‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ च्या आयकॉनिक गाण्यांपैकी एक ठरलं. आजही हे गाणं ऐकू आलं तरी लोक ते दिवसभर प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत ते गुणगुणतात.
Leave a Reply