
अनेक भाविक वेगवेगळ्या कारणांसाठी देवाकडे नवस बोलत असतात. नवस पूर्ण होताच भाविक त्यांच्या नवसाप्रमाणे देवाला काही दान करत असतात. मात्र, 105 वर्षे जुने हनुमान मंदिर हे सध्या चर्चेत आलं आहे. या मंदिरात कोणीही नवस बोलला तर तो भाविक नवस पूर्ण होताच हनुमानाला चांदीचे डोळे दान करतात. कुठे आहे हे हनुमान मंदिर? पाहूयात सविस्तर
बिहारमधील दरभंगा येथे भगवान हनुमानांचे एक प्रसिद्ध मंदिर असून, गेल्या अनेक दशकांपासून हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र बनले आहे. सुमारे 105 वर्षे जुने असलेल्या या मंदिराची स्थापना 1920 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, सुरुवातीला या ठिकाणी केवळ बजरंगबलीची एक छोटी मूर्ती आणि अवघ्या तीन फूट जागेत मंदिर होते.
स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे शंभर वर्षांपूर्वी या परिसरात घनदाट जंगल आणि निर्जन वातावरण होते. त्यावेळी येथे शाळेची इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. काम सुरळीत पार पडावे, या श्रद्धेने ठेकेदाराने तेथे हनुमानाची छोटी मूर्ती स्थापन केली. पुढे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना निर्माण झाली आणि मंदिराची प्रसिद्धी हळूहळू आसपासच्या गावांपासून विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचली.
हनुमान मंदिरासोबत राम दरबार आणि शिवमंदिरही
भाविकांची श्रद्धा वाढत गेल्यानंतर मंदिराच्या परिसराचा विस्तार करण्यात आला. नवस पूर्ण झाल्यानंतर भक्तांनी एकत्र येऊन येथे राम दरबाराची स्थापना केली. त्यामध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या. त्यानंतर मंदिर परिसरात भगवान शिवाचेही स्वतंत्र मंदिर उभारण्यात आले.
आज मंदिर परिसरात शांतता आणि स्वच्छतेचे वातावरण पाहायला मिळते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येथे आध्यात्मिक समाधान मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नवस पूर्ण झाल्यावर चांदीचे डोळे अर्पण करण्याची परंपरा
या मंदिरातील सर्वात अनोखी परंपरा म्हणजे हनुमानाला चांदीचे डोळे अर्पण करण्याची प्रथा. एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या श्रद्धेनुसार मंदिरात योगदान देतो. काही भाविक मंदिराच्या बांधकामासाठी मदत करतात तर काही मार्बल किंवा टाइल्स बसवून देतात. मात्र, चांदीचे डोळे अर्पण करण्याची परंपरा विशेष आकर्षण ठरली आहे.
टीप. मंदिराच्या चमत्कारांबाबत सांगितल्या जाणाऱ्या कथा आणि मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धा या स्थानिक पुजारी, भाविक आणि जनश्रुतींवर आधारित आहेत. त्यामुळे या दाव्यांकडे धार्मिक श्रद्धा आणि परंपरेच्या दृष्टीने पाहावे.
Leave a Reply