
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. “अजून दोन पक्ष फोडण्यासाठी पक्ष तर शिल्लक हवेत,” असे म्हणत भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या पक्षातील आमदारांच्या संख्येवर उपरोधिक टीका केली. त्यांनी सुळे यांना उद्देशून, “त्यांनी त्यांचा उरलेला पक्ष सांभाळावा,” असा सल्लाही दिला. भातखळकर यांनी पुढे बोलताना, सुप्रिया सुळे यांच्या पक्षात आता फक्त टोयोटा इनोव्हामध्ये बसेल इतकेच आमदार शिल्लक आहेत, असा चिमटा काढला.
महाविकास आघाडीवर निशाणा साधत, महायुती सरकार राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रभागी असल्याचे भातखळकर यांनी नमूद केले. “अहो, फोडायला पक्ष तरी शिल्लक पाहिजेत ना!” या शब्दांत त्यांनी सुळे यांना लक्ष्य केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपला उरलासुरला पक्ष सांभाळण्याचे आणि जनतेची सेवा करण्याचे काम करावे. महायुती सरकारकडे लक्ष देण्याची त्यांना गरज नाही, असेही भातखळकर स्पष्ट केले.
Leave a Reply