
समृद्धी महामार्गावर प्रवास करताना अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. या मार्गावर प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. असाच एक थरारक अनुभव मराठी अभिनेता सौरभ चौगुलेला आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरीजवळ टायर पंक्चर झाल्यानंतर कोणीही मदतीला नसल्याचे सांगितले.
अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
सौरभने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत समृद्धी महामार्गावर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की, “काल समृद्धी महामार्गावरन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरीजवळ माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. मी गाडी बाजूला लावली. गाडीत माझ्याकडे स्टेपनी असल्यामुळे मी टायर चेंज केला. थोडं पुढे गेलो 200 मीटर, तर मला कळलं माझ्या गाडीचं दुसरं टायरसुद्धा पंक्चर झाले आहे.”
View this post on Instagram
75 ते 80 किलोमीटरपर्यंत मदत मिळाली नाही
पुढे तो म्हणाला की, “लकीली, ते टायर पूर्ण फ्लॅट झाले नव्हते. त्या टायरमधली फक्त हवा कमी झाली होती. मी म्हटलं की मी थोडं थोडं हळूहळू पुढे चालत राहीन. पुढे चालता-चालता कुठेच मला काही आपत्कालीन यंत्रणा दिसली नाही. म्हणजे तो पट्टा इगतपुरी ते डायरेक्टली कल्याण, म्हणजे तो ऑलमोस्ट 75 ते 80 किलोमीटरचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये कुठेच काहीच यंत्रणा नाही. एका इन्शुरन्स कंपनीची रिकव्हरी व्हॅन तिथून जात होते ते मी पाहिलं. त्यामुळे त्यांनी मला एस्कॉर्ट केलं, कल्याणपर्यंत. जेणेकरून मध्ये मी कुठे अडकलो तर मला हेल्प करतील. पण ही खूप वाईट गोष्ट आहे. तिथे मागच्या आठवड्यातसुद्धा अपघात होता होता वाचलाय. तिथे अपघाताची साखळीच चालू असते. पण तरीसुद्धा प्रशासन याच्याकडे बघत नाही.”
प्रशासनाला केली विनंती
सौरभने व्हिडीओच्या शेवटी प्रशासनाला विनंती केली आहे. “माझी प्रशासनाला खरंच एक विनंती आहे की याची नोंद घ्यावी. तुम्हाला माहितीये की तिकडे कायम अपघात होत असतात, तर त्यावरती नक्की काहीतरी तोडगा काढा. ही विनंती” असे तो म्हणाला.
Leave a Reply