
टिटवाळा स्थानकाजवळ सुरू असलेल्या रेल्वे कामामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द झाल्या आहेत किंवा प्रचंड उशिराने धावत आहेत. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. याचा परिणाम म्हणून आंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. लोकलच्या विलंबामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्टरच्या कार्यालयात जाऊन आपला तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांचा आरोप आहे की, लोकल उशिराने येत असताना किंवा रद्द होत असतानाही त्यांना वेळेवर योग्य माहिती दिली जात नाही.
यामुळे त्यांना ताटकळत उभे राहावे लागते आणि महत्त्वाच्या कामांसाठी पोहोचण्यास विलंब होतो. “लोकल उशिराने असेल तर तिकीट काउंटरही बंद करा किंवा प्रवाशांना आधी माहिती द्या,” अशी स्पष्ट मागणी प्रवाशांनी केली. दोन तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. टिटवाळा जवळील कामामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणे आणि प्रवाशांना वेळेवर अचूक माहिती पुरवणे अत्यंत आवश्यक आहे.
Leave a Reply