
विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी येथील 15-16 लोकांना जीव गमवावा लागला. पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने अख्खं राज्य हादरलं असून संतापाचं वातावरण आहे. हे प्रकरण आता चांगलचं तापलं असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केलं. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया बाहेर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं असून लोकांचा बळी गेल्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांचा संताप दिसत असून बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतानाच, त्यांनाही गराडा घालत जाब विचारण्यात आला.
कार्यकर्ते आक्रमक
याप्रकरणातील आरोपी , गुन्हेगार योगेश वानखेडेला परत परत कोणी सोडलं? वानेखेडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला कोणी सोडलं, असा सवाल विचारण्यात आला. तसेच पोलिस आयुक्तांनी 13 अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण महत्वाचा दोषी बाहेर असताना त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही, त्यांची नावं अजून का बाहेर आलेली नाहीत, असा सवाल आक्रमक कार्यकर्त्यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता.
गुलाबी गँगही रस्त्यावर, दारू माफियांवर कठोर कारवाईची मागणी
तर दुसरीकडे गुलाबी गँगही रस्त्यावर उतरली आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात संगीता तिवारी यांच्या गुलाबो गॅंग कडून आंदोलन करण्यात आलं. काल विषारी दारूमुळे पुण्यात झालेल्या १५ पेक्षा जास्त नागरिकांचा दुर्दैवी मृत्यूनंतर, बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या गुत्त्यांविरोधात गुलाबो गँगने “हल्लाबोल आंदोलन” केलं. यावेळी हातात फुगे आणि काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पुण्यातील सर्व बेकायदेशीर दारू गुत्ते तात्काळ बंद करावेत. विषारी दारू विक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, मृतांच्या कुटुंबियांना न्याय व आर्थिक मदत द्यावी. महिलांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू माफियांवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply