
लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित दुरुस्ती विधेयक पास होऊ शकले नाही. 528 पैकी 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल, तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केले. दोन तृतियांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक पास होऊ शकले नाही. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधत महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केले. या विधेयकाच्या अपयशासाठी पंतप्रधानांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. विरोधकांनी आपल्या स्वार्थामुळे हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. देशातील महिला त्यांना कधीही माफ करणार नाहीत. पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
विधेयक पडले तेव्हा विरोधकांनी टाळ्या वाजवल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशातील सर्व माता-बहिणींची माफी मागतो कारण हे विधेयक पास होऊ शकले नाही. सरकारसाठी देशहित सर्वोच्च आहे. पण जेव्हा काही लोकांसाठी पक्षहित देशहितापेक्षा मोठे ठरते, तेव्हा त्याचा फटका नारीशक्तीला आणि देशालाही बसतो. काल देशातील कोट्यवधी महिलांचे लक्ष संसदेकडे होते. नारीहिताचा प्रस्ताव फेटाळला गेला तेव्हा काही पक्षांचे लोक टाळ्या वाजवत होते. हे फक्त टेबल वाजवणे नव्हते, तर नारीच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानावर आघात होता. संसदेत नारीशक्ती वंदन दुरुस्तीला ज्यांनी विरोध केला, ते नारीशक्तीला गृहित धरत आहेत.
विरोधकांना शिक्षा मिळेल
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आरोप करताना म्हटले की, काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला आहे. महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी जे केले, त्यासाठी त्यांना शिक्षा मिळेल. हे करताना या पक्षांनी संविधान निर्मात्यांच्या भावनांचाही अपमान केला. नारी सर्व काही विसरू शकते, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे संसदेत काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या या वर्तनाची वेदना प्रत्येक स्त्रीच्या मनात कायम राहील.
घराणेशाही असणाऱ्या पक्षांना महिलांची भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘देशातील महिला जेव्हा त्यांच्या भागात या नेत्यांना पाहतील, तेव्हा त्यांना आठवेल की याच लोकांनी संसदेत महिला आरक्षण रोखल्याचा आनंद साजरा केला होता. घराणेशाही असणाऱ्या पक्षांना भीती आहे की जर महिला सशक्त झाल्या, तर त्यांचे वर्चस्व संपेल. हे पक्ष आपल्या कुटुंबाबाहेरील महिलांना पुढे आणायला इच्छित नाहीत.’
Leave a Reply