
पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सव यंदा डीजेच्या ध्वनी प्रदुषणाने गाजत आहे. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेत डीजे विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना पाठींबा मिळू लागला. आणि त्यानंतर गणेश मंडळांनी बापट यांच्या विरोधात रान पेटवले आहे. विद्यानंद बापट हे टीव्ही 9 शी बोलत असताना चव्हाण या गणेशभक्ताने त्यांच्या कानशिलात लगावल्याने हे प्रकरण तापले आहे. त्यानंतर आज पुणेकरांनी डीजे विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाला बापट मात्र हजर राहिले नाही. या मोर्चात पुणेकर महिलेने टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली व्यथा मांडली.
आमच्या सोसायटीत डीजे विरोधात बोलू देत नाहीत. म्हणून आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे वर्षा कदम यांनी सांगितले. मुलाला फिट्स येतात आणि वडील आजारी असल्याने पहिल्या मजल्यावर घर घेतले होते. मात्र, आता मला घर विकण्याचा सल्ला दिला जात आहे. वडिलांना त्रास होतोय म्हणून दहा वर्षे वडिलांच्या खोलीची खिडकी उघडली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला त्रास होतो म्हणून डीजे विरोधात बोललो तर धर्माच्या विरोधात बोलता असा आरोप केला जातो असेही त्या म्हणाल्या.
डीजे विरोधात बोलतो म्हणून आम्हाला वाळीत टाकले आहे. मैत्रिणींनी बोलले बंद केले आहे. डीजेचा इतरांनाही त्रास होतो, पण ते बोलत नाहीत. त्यांनाही वाटतं त्यांनाही वाळीत टाकलं जाईल. घर शिफ्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आजारपण, लहान मुलाचं कारण दिलं तरी ते ऐकत नाहीत असेही वर्षा कदम यांनी सांगितले.
गणपती उत्सव आणि इतर कार्यक्रमाला मी जात नाही. डीजे लावल्यानंतर भिंतींना कंप सुटतो. माझ्या मुलाला 5 वर्षांपासून फिट्सचा त्रास आहे. पाच वर्षांपासून मुलाला त्रास आहे. दहा वर्षे आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. गणपतीच्या दिवसांमध्ये आम्ही बाहेर जायचो किंवा आठव्या मजल्यावर जाऊन झोपायचो, तिथं रिफ्युजी एरिया आहे, लाईट आणि मच्छरचा त्रास होत होता.
वडील आजारी असल्याने त्यांना इथं आणलं होतं.रुग्णालयात उपचार करून ऑक्सिजन लावला होता.दहा वर्षे झालं खिडकी उघडली नाही. नंतर नाशिकला नेलं,नंतर पुण्यातही आणलं. नवरात्रीचा कार्यक्रम सुरू होता. साऊंड सिस्टीम कमी जास्त करत होते.आवाज कमी करा म्हणून सांगत होते, वडिलांची तब्येत बरी नाही असे आम्ही सांगत होतो. अखेर मी वडिलांना गावाला घेऊन गेले,गावाला गेल्यानंतर दोन दिवसात त्यांचं निधन झालं.माझ्यासमोर वडिलांनी जीव सोडला. त्यांना सुखाने राहू द्यायला हवे होते. त्यांना इथं राहू दिलं असत तर लवकर दवाखान्यात नेता आले असते असे अश्रू ढाळीत वर्षा कदम यांनी सांगितले.
Leave a Reply