
रेल्वेने प्रवास करताना आपण गाडीचा वेग, डबे, स्थानके आणि रेल्वे रुळ यांसारख्या अनेक गोष्टी पाहतो. मात्र, या प्रत्येक गोष्टीमागे विशिष्ट अभियांत्रिकी आणि शास्त्रीय कारणे दडलेली असतात. रेल्वे रुळांच्या जोडांमध्ये दिसणारी छोटी फट हीदेखील त्यापैकीच एक महत्त्वाची बाब आहे.
अनेकदा दोन रेल्वे रूळ ज्या ठिकाणी जोडले जातात, तिथे त्यांच्यामध्ये थोडी जागा ठेवलेली दिसते. पहिल्यांदा पाहताना ही फट धोकादायक वाटू शकते. मात्र, रेल्वेची सुरक्षितता लक्षात घेऊनच ही जागा ठेवली जाते.
रेल्वेचे रूळ प्रामुख्याने स्टीलचे बनलेले असतात. तापमान वाढल्यावर स्टीलचा विस्तार होतो, तर तापमान कमी झाल्यावर ते आकुंचन पावते. एखाद्या छोट्या रुळाच्या तुकड्यावर याचा परिणाम फारसा जाणवत नाही. मात्र, अनेक किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचा विचार केला तर तापमानातील बदलामुळे रुळांच्या लांबीमध्ये लक्षणीय फरक पडू शकतो.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर रूळ प्रसरण पावतात. जर रुळांना जोडताना कोणतीही जागा ठेवली नाही, तर या प्रसरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही. परिणामी रुळांमध्ये अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुळ वाकणे किंवा त्यांची स्थिती बदलणे यांसारख्या समस्या निर्माण होऊन रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो.
याउलट, तापमान कमी झाल्यावर रूळ आकुंचन पावतात. त्यामुळे रुळांची रचना करताना तापमानातील या बदलांचा विचार केला जातो. रुळांमधील जोड आणि त्यांची रचना अशा पद्धतीने केली जाते की तापमानामुळे होणाऱ्या हालचाली नियंत्रित करता येतील.




Leave a Reply