
कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. यामध्ये काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काल चेंबूर येथे झाड कोसळ्यामुळे घडलेल्या बस अपघातात एका चिमुकल्याने जीव गमावला होता तर अनेक जखमी झाले होते. त्यामुळे शासन सर्व ठिकाणी झाडांचे सर्वेक्षण करत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भगांना रेड, तर काहींना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Leave a Reply