
2000 दशकाच्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यापैकीच एक नाव म्हणजे मालिनी शर्मा. 2002 मध्ये आलेल्या ‘राज’ या हॉरर चित्रपटातून मालिनी शर्माने अभिनयक्षेत्रात आपली छाप पाडली होती. मात्र या चित्रपटानंतर ती ग्लॅमरच्या दुनियेतून जवळपास गायबच झाली. आता तब्बल 23 वर्षांनंतर मालिनी पुन्हा चर्चेत आली आहे. मालिनीला मॉडेलिंगसोबतच म्युझिक व्हिडीओमधून लोकप्रियता मिळाली होती. बॉम्बे वाइकिंग्सच्या ‘क्या सूरत है’ या गाण्यामुळे तिला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘राज’मध्ये बिपाशा बासू आणि दिनो मोरियासोबत झळकली होती. मात्र अभिनयातील ही सुरुवात फार काळ टिकली नाही. मालिनीने ग्लॅमर आणि सततच्या कॅमेऱ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने स्वत:साठी अगदी वेगळं आयुष्य निवडलं.
मुंबईच्या झगमगाटापासून थेट सह्याद्रीच्या कुशीत
मालिनी सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फार्मस्टे चालवते. ‘द स्लो लोकल’ असं या फार्मस्टेचं नाव आहे. इथे ती निसर्गाच्या सान्निध्यात साधं आणि शांत आयुष्य जगतेय. विशेष म्हणजे मालिनी स्वत: तिच्या फार्मवर भाज्या पिकवते, पाहण्यासाठी स्वयंपाक करते आणि त्यांचं आदरातिथ्य करते. निसर्गाशी जोडलेलं जीवन जगणं हा तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे.
मालिनीचा व्हिडीओ-
View this post on Instagram
23 वर्षांनंतर मालिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मी जिवंत आहे, मी इथेच आहे”, असं ती या व्हिडीओत म्हणाली. ती आता ‘द स्लो लोकल डायरीज’च्या माध्यमातून तिच्या आयुष्याची झलक लोकांसमोर आणत आहे. मालिनीच्या आयुष्यातील हा बदल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. प्रसिद्धी, पैसा आणि ग्लॅमरच्या मागे न धावता तिने स्वत:च्या आवडीचं, निसर्गाच्या जवळचं आयुष्य निवडलं. मालिनी शर्मा तब्बल 23 वर्षांनंतर कॅमेरासमोर आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये पुन्हा अभिनयात परतण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘राज’ हा चित्रपट त्याकाळी खूप यशस्वी ठरला होता. मुख्य कलाकारांच्या तुलनेत मालिनीची भूमिका लहान असली तरी तिच्या उपस्थितीने प्रेक्षकांवर कायमस्वरुपी छाप सोडली. चित्रपटातील ‘आपके प्यार में’ हे तिचं गाणं आजंही लोकप्रिय आहे. याच काळात मालिनीने अभिनेता प्रियांशू चॅटर्जीशी लग्न केलं. प्रियांशूने 2001 मध्ये ‘तुम बिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
Leave a Reply