
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' या चित्रपटातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक गाण्यांपैकी एक मानले जाते. आई, गाव, बालपण आणि कुटुंबाच्या आठवणी जागवणाऱ्या या गाण्याने देश-विदेशातील लाखो भारतीयांना अश्रू अनावर केले.
विशेष म्हणजे, हे अजरामर गाणं गाण्यासाठी गझलसम्राट पंकज उधास सुरुवातीला तयार नव्हते. या गाण्यातील विरह आणि भावनांना आपण न्याय देऊ शकू का, अशी शंका त्यांना होती. मात्र दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांना समजावले की, परदेशात आपल्या कार्यक्रमाला आलेल्या भारतीयांसमोर हे गाणं गात असल्याची भावना मनात ठेवून गायचे.
त्यानंतर पंकज उधास यांनी हे गाणं रेकॉर्ड करण्यास होकार दिला. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर स्टुडिओतील अनेकजण भावूक झाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही या गाण्याचा प्रभाव तितकाच तीव्र होता. विशेषतः परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी हे गाणे ऐकताना आपल्या कुटुंबीयांच्या आठवणींनी अश्रू ढाळल्याचे अनेक प्रसंग घडले.
पंकज उधास यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्येही हे गाणं ऐकताना श्रोते भावूक होत असत. एकदा तर वातावरण इतके भावनिक झाले की, कार्यक्रमानंतर त्यांनी श्रोत्यांची माफी मागत दुसरे हलकेफुलके गाणे सादर केले.
जवळपास चार दशके उलटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, आजही ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक आणि अजरामर गाण्यांमध्ये गणले जाते.




Leave a Reply