
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 हजारपेक्षा जास्त अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. नोकरी असूनही किंवा वार्षिक उत्पन्न अधिक असतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. पुरवठा विभागामार्फत मिशन सुधार या मोहिमेअंतर्गत रेशनकार्डची कसून तपासणी सुरू आहे. या मोहिमेदरम्यान, दहा निकषांच्या आधारावर शिधापत्रिकांची पडताळणी केली जात आहे.
यामध्ये 862 शिधापत्रिका धारकांचे वार्षिक उत्पन्न अधिक असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय सेवेत असलेले तब्बल 16 हजार 693 लोक रेशन दुकानातून मोफत धान्य घेत असल्याचे समोर आले आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वास्तविक पात्र लाभार्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळावा, यासाठी पुरवठा विभाग ही विशेष मोहीम राबवत आहे. या कारवाईमुळे शासकीय योजनेचा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे.
Leave a Reply