
मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची सक्ती केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याआधी सरनाईकांनी चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. फडणवीसांच्या या निर्णयामुळे महायुती सरकारमध्ये, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, अशी नाराजी शिंदेसेनेतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे, या निर्णयानंतर मुंबईतील अमराठी रिक्षा चालकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाके फोडण्यात आले आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यही करण्यात आले. भाजपचे झेंडेही या जल्लोषात झळकले. रिक्षा चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दाखवल्याने आणि अल्पावधीत भाषा शिकणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर एक वर्ष रिक्षा चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply