
क्रिकेट विश्वात एक काळ गाजवणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक आहे. सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि दिवंगत रमाकांत आचरेकर यांचा शिष्य म्हणून त्याची ओळख आहे. पण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि सर्व काही गमवत गेला. विनोद कांबळी 29 ऑक्टोबर 2000 साली श्रीलंकेविरुद्ध शारजाहमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर पुन्हा मैदानात दिसला नाही. त्यामुळे बराच कालावधी लोटला आणि अचानक सार्वजनिक व्यासपीठावर त्याचं दर्शन घडलं. वर्ष 2025 मध्ये मुंबईत दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीसभा कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. तेव्हा त्याला पाहून अनेकांना धक्का बसला. कारण त्याची प्रकृती पूर्णपणे ढासळली होती. इतकंच व्यासपीठावर कसा बसा पोहोचला होता. त्याला सचिन तेंडुलकरचा आधार घ्यावा लागला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या काळजात धस झालं. असं असताना मागच्या आठवड्यात त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाल्याचं समोर आलं. त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच काय तर ब्रेन स्टोक्सचा धोका असल्याचं बोललं जात आहे.
विनोद कांबळीने सुरूवातीच्या टप्प्यात या आजाराकडे फार गंभीरतेने पाहिलं नाही. त्यामुळे आता मेंदूत तयार झालेल्या रक्ताच्या गुठळ्या काढणं अशक्य असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन गंभीर समस्या उद्भवू शकतात.मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं सांगितलं आहे. रक्ताची गुठळी केवळ शारीरिक हालचालींवरच नव्हे, तर मज्जासंस्थेच्या कार्यावरही परिणाम करत असल्याचे दिसते.
मेंदूत रक्ताची गुठली होण्याचं कारण की…
मेंदूत रक्ताची गुठली होणं हे गंभीर आजार आहे. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन खंडीत होतो. या गुठळ्यांमुळे ब्रेन स्ट्रोक्स येण्याची भीती असते. जगभरातील प्रौढांमध्ये अपंगत्व आणि मृत्यूचं कारण ठरलं आहे. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने मेंदूच्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे पेशी झपाट्याने मरतात. रक्तपुरवठ्यातील काही मिनिटांचा खंड ही मेंदूचं कधीही न भरून येणारं नुकसान करून जातो. त्यामुळे अशा स्थितीत प्राथमिक पातळीवर काळजी घेणं गरजेचं असतं.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही विशिष्ट वैद्यकीय स्थिती, जीवनशैली आणि अनुवांशिक घटकांमुळे रक्ताच्या गुठल्या होऊ शकतात. मेंदूच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागात या गुठळ्या होऊ शकतात. एट्रियल फायब्रिलेशन, हाय ब्लड प्रेशर, मधूमेह, हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट वॉल्वचा आजार, एथेरोस्क्लेरोसिस, स्थूलपणा यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. इतकंच काय तर धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन अतिप्रमाणात करणं, दारू पिणं हे देखील कारणीभूत ठरतं. तसेच ट्रान्स फॅट आणि अतिप्रमाणात मिठाचं सेवन करणंही घातक असतं. त्याचबरोबर शारीरिक हालचालींचा अभावही या समस्येला कारण ठरू शकतो.
रक्ताच्या गुठळ्या झालेत की नाही कसं कळतं?
मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यास अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. मेंदूतील रक्ताभिसरणात अडथळा येत असल्यास अचानक आणि तीव्र डोकेदुखी जाणवते. शरीराची एक बाजू सुन्न होते किंवा लकवा मारतो. इतकंच काय तर अंधुक दिसतं किंवा दुहेरी दृष्टी होते. शारीरिक संतुलन बिघडतं आणि चालताना चक्कर येते. त्याचबरोबर अनेक गोष्टी विसरतो. अशा स्थितीत डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढचा धोका टाळता येईल.
विनोद कांबळीची क्रिकेट कारकिर्द
विनोद कांबळीचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी झाला. 1988 मध्ये शारदाश्रम विद्यामंदिरसाठी खेळताना एका शालेय सामन्यात सचिन तेंडुलकरसोबत 664 धावांची विक्रमी भागीदारी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यात विनोद कांबळीचं योगदान 349 धावांचं होतं. 1993 साली विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. 1993 मध्ये वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 224 आणि झिम्बाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या. तर इंग्लंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध सलग तीन कसोटी शतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू ठरला. 1996 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनोद कांबळीने रडतच मैदान सोडलं आणि सामना श्रीलंकेने जिंकला. त्याच्या या कृतीचं अनेक वर्षे चर्चा झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा संघर्षाचा काळ सुरू झाला.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये आरोग्यविषयक देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply