
नांदेड-भोकर मार्गावरील भीषण अपघाताची घटना ताजी असताना भंडारा जिल्ह्यातही भयंकर अपघात झाला आहे. भंडाऱ्यातील नागपूर-रायपूर महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सलग दोन दिवस झालेल्या अपघातात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील नागपूर-रायपुर महामार्गावरील पिंपळगाव/सडक येथील भाऊचा ढाबा जवळ पहाटेच्या सुमारास एका मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्स यांच्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे पोलीस अधिकारी रवींद्र रेवतकर यांनी ही माहिती दिली.
अपघात कसा झाला?
वाहनातील सर्व मृत प्रवासी हे मूळचे छत्तीसगडचे आहेत. ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. नागपूरच्या दिशेने जाताना भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावर निघणाऱ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या मजुरांच्या ट्रॅक्सने धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच ठार झाले. तर जखमींना भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. तसेच त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात
नांदेड- भोकर मार्गावर भीषण अपघातात आठ जण ठार झाले. ऐन पोळ्याच्या दिवशी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून सात जण जखमी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. जखमींवर भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
Leave a Reply