
Bollywood News : मुंबईच्या फिल्मी दुनियेत अनेक बंगले, आलिशान घरे आणि कलाकारांच्या यश-अपयशाशी जोडलेल्या कथा ऐकायला मिळतात. त्यापैकीच एक गूढ आणि चर्चेत राहिलेली कथा म्हणजे ‘आशीर्वाद’ या बंगल्यााची. एक असा बंगला, ज्याने तीन मोठ्या स्टार्सना आधी प्रचंड प्रसिद्धी दिली आणि नंतर अचानक जमिनीवर आणून सोडले.
ही कहाणी सुरू होते अभिनेता भारत भूषण यांच्यापासून. 1950 च्या सुमारास त्यांनी हा बंगला विकत घेतला आणि त्यानंतर त्यांच्या करिअरला अक्षरशः पंख फुटले. बैजू बावरा आणि मिर्जा गालिब सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे ते त्या काळातील मोठे स्टार बनले. मात्र, ही यशाची लाट फार काळ टिकली नाही. हळूहळू त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपयश पाहिले आणि अखेर ते आर्थिक संकटात सापडले. सुरुवातीला ‘लकी’ मानला गेलेला हा बंगला, आता ‘अपशकुनी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
यानंतर 1960 मध्ये हा बंगला अभिनेता राजेंद्र कुमार यांनी सुमारे 60,000 रुपयांत विकत घेतला. त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून या घराचे नाव ‘डिंपल’ ठेवले. या घरात आल्यानंतर त्यांच्याही करिअरला मोठी भरारी मिळाली. मदर इंडिया आणि धूल का फूल सारख्या चित्रपटांमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. पण नशिबाचा खेळ इथेही दिसला. काही काळानंतर त्यांचेही करिअर घसरू लागले आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
इंडस्ट्रीमधील चर्चेत असणारा अलिशान बंगला
यानंतर 1969 मध्ये राजेश खन्ना यांनी हा बंगला 3.5 लाख रुपयांत खरेदी केला आणि त्याचे नाव ‘आशीर्वाद’ असे ठेवले. या घरात राहायला आल्यानंतर राजेश खन्ना यांचे करिअर शिखरावर पोहोचले. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट देत हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. मात्र, काही वर्षांनी त्यांच्या कारकिर्दीतही घसरण सुरू झाली. माध्यमांमध्ये अशी चर्चा रंगू लागली की, ज्या घराने त्यांना यश दिले, त्याच घराने त्यांच्याकडून ते हिरावूनही घेतले.
या संपूर्ण कथेमुळे ‘आशीर्वाद’ बंगला हा केवळ एक आलिशान निवासस्थान न राहता, एक रहस्यमय आणि चर्चेचा विषय बनला. काही लोक याला निव्वळ योगायोग मानतात तर काहीजण यामागे अपशकुन किंवा नशिबाचा खेळ असल्याचे सांगतात. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे या बंगल्यााची कथा आजही बॉलिवूडमध्ये गूढतेने आणि कुतूहलाने सांगितली जाते.
Leave a Reply