
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात झाली. पण त्यासाठी संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागलं. मागच्या काही वर्षात संजू सॅमसनने बरेच सामने बेंचवर बसून पाहिले. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही त्याच्या बाबतीत असंच घडलं. पण तेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचं सोनं केलं आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता पुन्हा एकदा त्याला बेंचवर बसावं लागल्याने माजी क्रिकेटपटू आर अश्विनने संताप व्यक्त केला आहे. अश्विनच्या मते, ज्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावली, त्या खेळाडूला मॅनेजमेंटकडून एक मोठी संधी आणि स्पष्टपणा मिळणं आवश्यक आहे. खेळाडूंना इतक्या झटपट बाहेरचा रस्ता दाखवल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडू शकतं. त्याचा खेळाडूंच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल.
अश्विनचं गंभीरच्या निर्णयावर टीकास्त्र
संजू सॅमसन सलग तीन सामन्यात फेल गेल्याने त्याच्या जागी वैभवला संधी दिली गेली. यावर अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘तुमच्यासमोर दोन किंवा तीन सीरिज असतात. जो चांगला खेळणार तो संघात राहणार. पण कोणीतरी आम्हाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. तर मी त्याला मोठी संधी दिली असती. सूर्यकुमार यादवला बाहेर काढलं तेव्हाही मी असं सांगितलं होतं. त्याचं कर्णधारपद काढून घेणं ठीक होतं. पण त्याला संघातून वगळणं हा निर्णय योग्य नव्हता. मी खेळाडूंशी स्पष्ट बोललो असतो की या मालिकेत खेळा आणि आपलं स्थान पक्कं करा. जर कामगिरी निराशाजनक राहिली तर तुम्हाला बाहेर केलं जाऊ शकतं.’
अश्विनच्या मते संजू सॅमसनला बाहेर काढल्याने संघाचा फलंदाजीचा समतोल बिघडला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि प्रशिक्षक स्टाफला याची जाणीव लवकरच होईल. अश्विनने सांगितलं की, ‘संजू सॅमसनला खूप लवकर संघातून बाहेर काढल्याने मी चिंतेत आहे. संजू या वेळेस काय विचार करत असेल? तो नेटमध्ये कोणत्या मानसिकतेने सराव करेल? या वेळी भारतीच्या संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये तीन डावखुरे फलंदाज आहेत. मला वाटतं की संघाचा समतोल राखण्यासाठी संजूला तीन नंबर आणण्याबाबत विचार करू शकतात. कारण गौतम गंभीरसहित पूर्ण स्टाफला माहिती आहे की संजूसोबत हे काही योग्य झालं नाही.’
ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडणार!
भारतीय संघातील या तडकाफडकी बदलामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. आर अश्विनने सांगितलं की, ‘यात संघाचं हित नाही. जर संजू आणि सूर्याला वगळलं, तर उद्या प्रत्येक खेळाडूंच्या मनात हीच भावना असेल. पुढचा नंबर आपला असेल असं वाटेल. असं वातावरण कोणत्याही संघासाठी चांगलं नाही.’
Leave a Reply