
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग संबोधत राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण केला आहे. सरनाईक यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून हा वाद सुरू झाला.
आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचा आरोप केला होता, तसेच हे काम पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने सुरू असल्याचा दावा केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी मिश्कीलपणे सांगितले की, कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असून, तुळजापुरातील सीसीटीव्हीद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. यावर कैलास पाटील यांनी सरनाईकांवर पलटवार करत म्हटले की, गंभीर प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही टिंगलटवाळी सुरू आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्याला हलके घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पाटील यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या नियमांनुसारच सीसीटीव्ही बसवले आहेत का, याची स्पष्टता देण्याची मागणी त्यांनी केली.
Leave a Reply