
कडक उन्हाच्या झळा या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता अनेकजण आहारात बदल करू लागलेत. या दमट हवामानात शरीर थंड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण प्रत्येकजण या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतील आणि अनेक फायदे देतील असे पदार्थ सेवन करत असतो. तर आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक थंड गुणधर्म असलेले मसाले आहेत, जे केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. बडीशेप, धणे आणि जिरे यांसारखे मसाले केवळ अन्नाला सुगंध आणि चवच देत नाहीत, तर पचनक्रिया सुधारण्यात, शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यात आणि उष्णतेचा प्रभाव कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. या मसाल्यांचे योग्य सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा देऊ शकता. या लेखात आपण तज्ञांकडून अशा पाच मसाल्यांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा तुम्ही या उन्हाळ्यात तुमच्या आहारात समावेश करू शकता.
पुदिन्याची पावडर
पोषणतज्ञ सांगतात की उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सुक्या पुदिन्याची पावडर अत्यंत प्रभावी मानली जाते. त्यात मेन्थॉल, अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन ए असतात. जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात. याच्या सेवनाने पोटातील जळजळ, गॅस आणि उलट्यांपासूनही आराम मिळतो. तुम्ही ही पावडर ताक, लिंबाचा रस किंवा दह्यामध्ये मिक्स करू शकता किंवा सॅलड आणि रायत्यामध्ये वापरू शकता.
धणेपूड
उन्हाळ्यात तुमच्या आहारात धण्यांचाही समावेश केला पाहिजे. कारण यामध्ये थंडावा देणारा गुणधर्म असतो, ज्यामुळे याचे सेवन केल्याने तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) टाळतात. उन्हाळ्यात तुम्ही धणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊ शकता किंवा त्याचा काढा तयार करून त्याचे सेवन करू शकता.
जिऱ्याचे दाणे
दिसायला लहान वाटणाऱ्या जिऱ्याच्या दाण्यातही आश्चर्यकारक फायदे आहेत. ते केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासही मदत करते. त्यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. उन्हाळ्यात जिऱ्याचे पाणी (उकळून थंड केलेले) पिणे खूप फायदेशीर ठरते. त्याचे सेवन ताक किंवा दह्यामध्ये मिक्स करता येते.
बडीशेप
बडीशेप तिच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनक्रियाही सुधारतात. उन्हाळ्यात बडीशेपचे पाणी पिणे किंवा ती चावून खाणे खूप फायदेशीर ठरते. तुम्ही सरबत किंवा हर्बल पेयांमध्येही बडीशेप घालू शकता.
वेलची पावडर
वेलचीमध्ये थंडावा देणारा गुणधर्मही असतो, जो शरीराला ताजेतवाने आणि थंड करतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही वेलची पाण्यात किंवा दुधात उकळून पिऊ शकता, किंवा सरबत आणि चहामध्ये टाकू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास आणि शरीराला ताजेतवाने होण्यासही मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply