
उन्हाळा सुरू झाला आहे. त्यात कडक उष्णतेचा सामना अनेकांनी केला असेलच. त्यात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी वादळ आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे लोकांना त्रास झाला आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीव्र उष्णतेची लाट थैमान घालण्याची शक्यता आहे. जसजसे दिवस पुढे जातील तसतशी उष्णतेची लाटही अधिक तीव्र होईल. यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. तापमान वाढल्याने शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा आणि कधीकधी उष्माघातासारख्या गंभीर समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे पुरेसे नाही तर शरीराला आतून थंड करणे आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरते.
म्हणून या कडक उन्हात डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर आपल्या आहारात काही देशी म्हणजे घरगुती घटकांचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या लेखात आपण अशा काही घटकांविषयी जाणून घेणार आहोत जे तुम्हाला उष्माघातापासून वाचवतील आणि डिहायड्रेशन टाळतील.
फालसा फळाचे सरबत
फालसा हे एक लहान, गोड आणि आंबट फळ आहे, ज्याचा आजकाल फार कमी लोक आपल्या आहारात समावेश करतात. तथापि हे दिसायला लहान फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला थंडावा देण्यास आणि डिहाड्रेशन टाळण्यास मदत करतात. फालसा फळाचे सरबत प्यायल्याने उष्माघाताचा प्रभाव कमी होण्यास आणि त्वरित ताजेपणा मिळण्यास मदत होऊ शकते.
मखाना भिजवून खाणे
बाजारात मखान्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पण साधा मखाना पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे मात्र फार कमी लोकांना माहीत आहेत. मखान्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात हाच मखाना पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि अशक्तपणा दूर होतो.
कच्चा कांदा खाणे
आयुर्वेद तज्ञ सांगतात की उष्माघात टाळण्यासाठी कच्चा कांदा खाणे आवश्यक आहे. कांद्यामध्ये सल्फर संयुगे, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचे तापमान राखण्यास मदत करतात. सॅलडच्या स्वरूपात कांदा खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत होऊ शकते.
चिया बियांऐवजी सब्जाचे करा सेवन
आजकाल लोक त्यांच्या डाएटमध्ये चिया बियांकडे खूप लक्ष देतात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की चिया बियांचा एक देशी प्रकारही आहे, ज्याला ‘सब्जा बिया’ म्हणतात. या स्वस्त आणि अधिक प्रभावी असतात. त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे शरीराला थंडावा देण्यास आणि दीर्घकाळ हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करतात. तुम्ही सब्जा बिया पाण्यात भिजवून सरबतामध्ये मिक्स करून सेवन करू शकतात.
कैरीचं पन्ह
तज्ञांच्या मते, उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी कैरीचं पन्ह हा एक पारंपरिक उपाय आहे. कच्चे आंबे पाण्यात शिजवून घ्या, त्यानंतर त्याचा गर काढावा आणि त्यात पाणी, मीठ व थोडे जिरे मिक्स करा. हे पेय नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट म्हणून प्यावे. यामध्ये व्हिटॅमिन सी, सोडियम आणि खनिजे असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता त्वरित भरून काढतात आणि उष्माघातापासून संरक्षण करतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
Leave a Reply