
पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. नारोवाल जिल्ह्यातील सिराज गावात जवळपास 100 वर्षे जुने हिंदू मंदिर पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंदिराची तोडफोड केल्याच्या वृत्ताचा निषेध केला असून, ही अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळाची निंदनीय तोडफोड असल्याचे म्हटले आहे.
भारताने व्यक्त केली चिंता
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, सिराज गावातील ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडल्याच्या वृत्तांची भारताने गंभीर दखल घेतली आहे. जवळपास 100 वर्षे जुन्या धार्मिक स्थळाची तोडफोड होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे त्यांनी म्हटले. भारताने मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केला आहे. मंदिराचे संरक्षण करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले असून, त्यांची उदासीनता चिंताजनक असल्याचे रणधीर जायसवाल यांनी म्हटले.
भारताकडून चौकशीची मागणी
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण किती केले जाते, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत, असे भारताने म्हटले आहे. भारताने पाकिस्तान सरकारला या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंदिर पाडण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, असे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच मंदिराची पुन्हा उभारणी किंवा पुनर्स्थापना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली आहे.
‘अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी’
रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानमधील अल्पसंख्याक नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे. अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचेही संरक्षण केले पाहिजे. मंदिर पाडल्याच्या घटनेत जे लोक दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पाकिस्तान सरकारने आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.
Leave a Reply