
महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. राज्यात विशेष म्हणजे कोकण पट्ट्यातील रत्नागिरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर मुंबईजवळील वसई-विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. सलग पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली. पुरामुळे अनेकांच्या घरात वीज कनेक्शन नव्हतं. काहींचे पिण्याचे पाणी प्यायचे वांदे झालेत. तर पाचव्या दिवशी देखील काही भागात नेटवर्क नसल्याचे समोर आलं आहे. 4 दिवस पुराचा तडाखा सहन केल्यानंतर पाचव्या दिवशी वसई-विरारमधील काही ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.
विरारमध्ये काय स्थिती?
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका वसई विरार, नालासोपारा भागात राहणाऱ्या लोकांना बसलाय. चार दिवसांनंतर या भागातील ७० टक्के परिस्थिती पूर्वपदावर आली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पाचव्या दिवशी विरार पश्चिम स्टेशन ते बोलिंज रस्ता, एसटी डेपो रस्ता, विवा कॉलेज ते जकात नाका रस्ता, डोंगरीपाडा रस्ता, ग्लोबल सिटी, अग्रवाल कॉम्पलेक्स रस्ता पूर्वपदावर आला आहे. तर विरार पूर्व परिसर सर्व पूर्वपदावर आला आहे. एम बी एस्टेट, रश्मी नगर, तिरुपती नगर, युनिटेक सोसायटी या ठिकाणी काही सखल भागात पाणी साचल्याने वीज नाही. मोबाईल नेटवर्क नाही, पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी गेल्याने पिण्याचे पाणी नाही.
नालासोपाऱ्यात परिस्थीती काय?
अतिवृष्टीदरम्यान नालासोपाऱ्यातील विविध भागात पाणी भरल्याचे दिसून आलं होतं. त्यानंतर नालासोपारा पूर्व भागातील सेंट्रलपार्क, आचोळा, तुळींज, टाकीपाडा, नागिनदास पाडा , विजय नगर, तर पश्चिम कडिल श्रीप्रस्थ, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, स्टेशन ते सोपारा गाव , नालासोपारा श्रीप्रस्थ विरार महाडा लिंक रोड पूर्वपदावर आला आहे. परंतु नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली आहे. या भागातील संतोषभुवन, बिलालपाडा, धानिवबाग , पेल्हार, रिचर्ड कंपाऊंड या परिसरातील काही सखल भागातील चाळीत पाणी साचल्याने परिस्थिती बिकट आहे. प्रशासनाकडून नागरिकांना मदत सुरू आहे.
वसईत स्थिती काय?
वसई पूर्व ते स्टेशन ते वसई फाटा भागातील वालीव फाटा, सातिवली, भोयडापाडा, एवरशाइन, वसंतनगरी, वालीव, रेंज नाका, मधुबन सोसायटी, नवघर पूर्वपदावर आलं आहे. तर वसई पश्चिम भागातील स्टेशन आनंद नगर, समता नगर, वसई गाव, सागरशेत, माणिकपूर परिसर पूर्वपदावर आला आहे.
Leave a Reply