
नागपुरात गेल्या सोमवारपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र आलेल्या आंदोलकांना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज भेटणार आहेत. मात्र, आंदोलकांची मुख्य मागणी ही थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची आहे. आंदोलकांनी आरोप केला आहे की, पुण्यातील चर्चेदरम्यान त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यांच्या २९ प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या मागण्यांमध्ये आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे मृत पावलेल्या तीन मुलींच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळावी, ही प्रमुख मागणी आहे. तसेच, १२,५०० पदांची पदभरती तातडीने पूर्ण करावी, अशीही त्यांची मागणी आहे. आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, केवळ काही मागण्या पूर्ण करून किंवा “लॉलीपॉप” देऊन त्यांना शांत केले जाणार नाही. सर्व २९ मागण्या पूर्ण झाल्याखेरीज ते आंदोलन मागे घेणार नाहीत. मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
Leave a Reply