
Stone Pelting across Bihar: NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधात बुधवारपासून बिहारमध्ये विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी बंद पुकारलेला आहे. आज या बंदचा व्यापक परिणाम दिसून आले. पटणा, छपरा, सिवान, गया, आरा, समस्तीपूर, सहरसा आणि नवदासह अनेक जिल्ह्यात आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. काही ठिकाणी रस्ता बंद आंदोलन, जाळपोळ, घोषणाबाजी, लाठीहल्ला आणि पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक जण जखमी झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यावरही अनेक भाग धुमसत होते.
पाटणामध्ये गांधी मैदानाजवळ जेपी गोलंबर आणि रामगुलाम चौकाच्या जवळपास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विविध संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले. पोलिसांनी दुपारी आंदोलनकर्त्यांना अडवले. अनेक ठिकाणी त्यांना हुसकावले. काही विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. पाटणामध्ये अनेक ठिकाणी, चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले. त्यामुळे आंदोलकांना आंदोलन करता आले नाही. गांधी मैदानावरही पोलिसांनी कडक पहारा ठेवला होता. या परिसरात गर्दी करण्यास आणि घोळक्याने फिरण्यास मनाई करण्यात आली होती. बिहार बंदला जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी पाठिंबा दिला होता. गांधी मैदानावरील राम गुलाम यांची प्रतिमा झाकण्याची मागणी करण्यात आली.
छपरामध्ये पोलिसांवर दगडफेक
छपरा येथील स्टेशन चौकात आंदोलक एकत्रआले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि अचानक दगडफेकीला सुरूवात झाली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तणाव वाढताच पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली गेली. तरीही पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाल्याचे सांगण्यात येते.
सिवानमध्ये तोडपोड तर गयामध्ये मोठा मोर्चा
बिहार बंद दरम्यान सिवानमध्ये आंदोलक प्रक्षुब्ध झाले. दगडफेकच नाही तर त्यांनी वाहनांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त तुकड्या मागवल्या. येथेही मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी दिली. अनेक ठिकाणी दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. गयामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी धरणे आंदोलन दिले. समस्तीपूरमध्ये रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. तर आरा शहरात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भोजपूर जिल्ह्यात नायका टोला या वळणावर AISA आणि RYA च्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले. काही ठिकाणी आगजाळ करण्यात आली.
Leave a Reply