
गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त आणि कारवाईसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या कारवाईच्या संदर्भातून रवीना टंडनने सांगितलेला रेस्टॉरंटमधील मजेशीर किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली रेस्टॉरंट्सची तपासणी आणि नियमांचे पालन याबाबत सुरू असलेल्या कारवाईवर या लेखातून भाष्य करण्यात आले आहे.
एका कॉलममध्ये रवीना टंडनने रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. त्या आणि त्यांच्या मित्रांनी रेस्टॉरंटमध्ये तंदुरी ब्रोकोली आणि चिकन टिक्का ऑर्डर केले. त्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला, मुंढे यांनी तुमच्या रेस्टॉरंटची तपासणी केली आहे का? असा प्रश्न विचारला.
यावर कर्मचाऱ्याने होकार देत, मुंढे यांनी मागील आठवड्यात रेस्टॉरंटची तपासणी केली होती आणि रेस्टॉरंट नियमांच्या कसोटीवर पात्र ठरल्याचे सांगितले. त्यानंतर रवीना टंडनने विनोदाने पनीर टिक्का ऑर्डर करण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला.
‘मुंढेची मार्टिनी’
यानंतर ड्रिंक्स आणि स्टार्टर टेबलवर आले. लेखिकेने पनीरचा तुकडा टूथपिकने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तोंडापर्यंत पोहोचण्याआधीच खाली पडून तिच्या मार्टिनी ग्लासमध्ये गेला. हा प्रसंग पाहून तिने सुरुवातीला नवीन ड्रिंक मागण्याचा विचार केला; मात्र त्याऐवजी या अनपेक्षित प्रसंगाला विनोदी स्वरूप देत तिने त्या पेयाला ‘मुंढेची मार्टिनी’ असे नाव दिले.
‘जिन, व्हर्माउथ, ऑलिव्ह आणि पनीर’ अशा मजेशीर शब्दांत या नव्या ‘कॉकटेल’चं वर्णन करत रवीना टंडनने हा किस्सा शेअर केला. या प्रसंगाला उपस्थित असलेल्या @anudewan5, @taniadeol आणि @lailabijlani तिघींना तिने सोशल मीडियावर टॅगही केले आहे.
View this post on Instagram
पुढे कोणत्या सरकारी विभागात सुधारणा होण्याची गरज
या हलक्याफुलक्या किस्स्याबरोबरच रवीना टंडनने तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावरही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. एखादा सरकारी अधिकारी आपले नियमित कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असेल, तर ते इतके दुर्मीळ आहे का की त्याची बातमी व्हावी? तसेच पुढे कोणत्या सरकारी विभागात सुधारणा होण्याची गरज आहे, असा सवालही तिने वाचकांना केला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या शिस्तप्रिय आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या प्रतिमेमुळे हा लेख चर्चेत आला आहे. रेस्टॉरंटमधील एका मजेशीर प्रसंगातून सुरू झालेला हा किस्सा पुढे सरकारी यंत्रणा, नियमांचे पालन आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर भाष्य करणारा ठरला आहे.
Leave a Reply