
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. अनेकांचे मृतदेह अजूनही चिखलात अडकलेले आहेत. अशातच आता बचाव पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे एका चिमुकलीला तब्बल 48 तासांनंतर चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. लष्कर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही धाडसी बचावमोहीम राबवली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेपाळमध्ये महापुरामुळे अनेक ठिकाणी माती आणि चिखलाचे ढिगारे साचले आहेत. अशाच एका ढिगाऱ्याखाली ही चिमुकली तब्बल दोन दिवस अडकून पडली होती. तिचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल आणि रेस्क्यू टीमकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर बचाव पथकाला यश आले आणि चिमुकलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
सुटका होताच रेस्क्यू टीमने अन्न चारले
चिखलाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर लष्कर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चिमुकलीची काळजी घेत तिला अन्न चारले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल 48 तास चिखलाखाली दबून राहिल्यानंतर चिमुकली जिवंत सापडल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाऱ्या लष्कर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे स्थानिक नागरिक व नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.
धन्यवाद भगवान, धन्यवाद सुरक्षाकर्मी।
दुई दिनसम्म माटोमुनि पुरिएकी बालिकाको जीवितै उद्धार, अस्पतालमा उपचार हुँदै।#nepal #highlight #everyoneシ゚ pic.twitter.com/WT9sEVJ4IQ
— Nirmal Prasai
(@NirmalPrasai5) August 29, 2026
आतापर्यंत 675 मृतदेह सापडले
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शाह यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत रसुवा, धादिंग, नुवाकोट, चितवन, तनहुँ, गोरखा, नवलपरासी ईस्ट आणि नवलपरासी वेस्ट या भागांतील विविध ठिकाणांहून 675 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या प्रकरणात सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना शाह यांनी सांगितले की, ‘सापडलेले मृतदेह एअरटाइट बॅगमध्ये ठेवण्यात येत असून, अनआयडेंटिफाइड अँड अनक्लेम्ड बॉडीज मॅनेजमेंट (फर्स्ट अमेंडमेंट) डायरेक्टिव्ह, 2026 अंतर्गत त्यांचे व्यवस्थापन केले जात आहे. दरम्या, 26 ऑगस्ट रोजी रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे रसुवा, नुवाकोट आणि धादिंगसह नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या पुरामुळे मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.

(@NirmalPrasai5)
Leave a Reply