
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नविषबाधेची घटना घडली आहे. घरात रात्री खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. यामध्ये उपचारादरम्यान सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, त्याच्या बहिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुष नारायण थोटे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने चिंचोली लिंबाजी या गावावर शोककळा पसरली आहे.
खिचडीतून विषबाधा?
घरात रात्री खिचडी खाल्यानंतर नारायण थोटे, त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना पहाटेपासून त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सिल्लोडला नेत असताना गुरूवारी आयुषचा मृत्यू झाला. सात वर्षीय गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात असुविधांचा बाजार
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात असुविधांमुळे विद्यार्थिनी हैराण झाल्या आहेत. द्वारकानगरातील भाड्याच्या जागेत चालणारे हे वसतिगृह नरकयातना गृह ठरले आहे. वसतिगृहितील भोजनाचा दरवाजा निकृष्ट असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. जेवणात अळ्या, तार आणि गोगलगाय आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू आहे. तक्रार करूनही मोठा बदल झाला नाही. तक्रारीनंतर आठ मेसचालक बदलले, पण अन्नाचा दर्जा मात्र खालावलेलाच आहे. या वसतिगृहात 250 मुली राहतात. पण स्वच्छतेसाठी केवळ दोनच कर्मचारी आहेत. अनेक दिवस स्वच्छताच होत नसल्याचा आरोप विद्यार्थिंनीनी केला आहे. खोलीत साप मुंगूस तर रात्री मोकाट कुत्री घुसत असल्याचा आरोपही विद्यार्थिंनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Leave a Reply