
भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिका रंगली जी आयर्लंड संघाने जिंकली. आयर्लंडसाठी ही ऐतिहासिक बाब ठरली. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर सर्वत्र टीका होत आहे. नुकतेच कर्णधारपद स्वीकारलेल्या श्रेयस अय्यरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारतीय संघाने एकूण तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अशा संघावर आयर्लंडने पराभव करावा अशी वेळ यावी म्हणजे खरंच अपमानास्पद आहे. आता या मालिकेतील अपयशानंतर कर्णधार श्रेयस अय्यरसह टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर स्वतः टीकेला सामोरे जात आहेत. मालिका गमावल्यानंतर आता दुसऱ्या एका देशाच्या क्रिकेट बोर्डानेही गंभीरची खिल्ली उडवली आहे. गंभीरबद्दल एक पोस्ट केली आहे.
दरम्यान, आपल्या विनोदी सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या आइसलँड क्रिकेटने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली आहे. सोमवारी ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये, आइसलँड क्रिकेटने भारतीय संघाच्या खराब कामगिरीची खिल्ली उडवली आणि गंभीर यांना आपल्या कोचिंग स्टाफमध्ये न घेण्याचा आपला इरादा जाहीर केला. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आइसलँड क्रिकेटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आम्ही हे स्पष्ट करतो की गौतम गंभीर यांना आमच्या कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. त्यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. अशा स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाला आयर्लंडमध्ये घेऊन जाणे आणि असे निकाल देणे ही खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी आहे.”
We can confirm that we don’t wish to add Gautam Gambhir to our coaching staff. He clearly has talent, though. To take those Indian players and deliver those results in Ireland takes truly remarkable gifts.
— Iceland Cricket (@icelandcricket) June 28, 2026
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला. मात्र, गतविजेत्यांना दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. बेलफास्टमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला, तर रविवारी पावसामुळे बाधित झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडने भारताला 1 धावेने पराभूत करून मालिका 2-0 ने जिंकली.
या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु त्यांची मजबूत फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि नुकत्याच संपन्न झालेल्या 2026 च्या टी-20 विश्वचषकातील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला संजू सॅमसन, या दोघांनाही दोन्ही सामन्यांमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील दोन्ही सलामीचे टी-20 सामने गमावणारा अय्यर हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. आता त्याचे लक्ष इंग्लंडविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करण्यावर असेल.
Leave a Reply