
आखाती प्रदेशातील तणावामुळे भारतासह जगभरात तेलाचे संकट ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतातील इधन पुरठ्यावर सरकारने काही प्रमाणात मर्यादा घातल्या आहेत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या संस्थांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारकडून या समस्येवर स्वदेशी आणि टिकाऊ उपाय शोधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सरकार व्यावसायिक स्वयंपाकासाठी इथेनॉल वापरण्यावर विचार करत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारने इथेनॉल वापरण्याबाबत विचार करत आहे, ही योजना प्रत्यक्षात आली, तर भविष्यात व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 कोटी लिटर अतिरिक्त एथेनॉल क्षमतेचा वापर स्वयंपाकासाठी करण्याची योजना आहे. येत्या काही आठवड्यांत याबाबत योजना तयार केली जाणार असून ती आंतर-मंत्रालयीन समितीसमोर सादर केले जाऊ शकते.
एलपीजीपेक्षा इथेनॉल स्वस्त
हायड्रस एथेनॉल व्यावसायिक एलपीजीच्या तुलनेत स्वस्त ठरू शकतो. यात सुमारे 95% एथेनॉल आणि थोडे पाणी असते. त्यामुळे त्याला अतिरिक्त डीहायड्रेशन प्रक्रियेची गरज नसते आणि त्याची किंमत कमी असते. व्यावसायिक एलपीजीची किंमत सुमारे 103 रुपये प्रति किलो आहे, तर हायड्रस इथेनॉल 70 रुपये प्रति किलो आहे. मात्र, इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू एलपीजीपेक्षा कमी असल्याने त्याचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो.
इथेनॉल कशापासून तयार होते?
भारतात इथेनॉल मुख्यतः ऊस, मका आणि तांदळापासून तयार केले जाते. याचा वापर जैवइंधन (बायोफ्यूल) म्हणून केला जातो. भारतात एथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्रीही केली जाते. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इथेनॉल हा इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलपेक्षा वेगळा आणि स्वस्त असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारची सुरुवातीला हॉटेल, विमानतळ आणि रेस्टॉरंटसारख्या व्यावसायिक ठिकाणी स्वयंपाकासाठी इथेनॉल वापरण्याची योजना आहे. यावर सध्या चर्चा सुरु आहे. यावर शिक्कामोर्तब झाले तर एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. तसेच इथेनॉल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो.
Leave a Reply