
निसर्ग, माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याचे सुंदर उदाहरण सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वैष्णोरा गावात पाहायला मिळत आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी गावातील अनिल ठाकरे यांच्या घराच्या छतावर एका माकडीणीने गोंडस पिल्लाला जन्म दिला. मात्र दुर्दैवाने प्रसूतीनंतर काही वेळातच त्या माकडीणीचा मृत्यू झाला. आईच्या मायेपासून वंचित झालेल्या त्या निष्पाप पिल्लाचे भविष्य अंधारमय दिसत होते.
ही हृदयद्रावक घटना पाहून अनिल ठाकरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मृत माकडीणीवर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांनी अनाथ झालेल्या त्या पिल्लाला आपल्या घरी आणले आणि त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. प्रेमाने त्यांनी त्या पिल्लाचे नाव 'बजरंग' ठेवले.
सुरुवातीला दूध पाजणे, काळजी घेणे आणि त्याला सुरक्षित वातावरण देणे, ही सर्व जबाबदारी ठाकरे कुटुंबाने आपल्या लेकराप्रमाणे पार पाडली. दिवसेंदिवस बजरंग आणि ठाकरे कुटुंबामधील जिव्हाळ्याचे नाते अधिकच घट्ट होत गेले. काही दिवसांनी त्याला जंगलात सोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र बजरंग पुन्हा आपल्या लाडक्या कुटुंबाकडेच परतला. त्यामुळे आता तो ठाकरे कुटुंबाचाच एक अविभाज्य सदस्य बनला आहे.
आज बजरंग घरातील प्रत्येकाशी अगदी आपुलकीने वावरतो. परिसरातील लहान मुले त्याला प्रेमाने दूध पाजतात, त्याच्यासोबत खेळतात आणि त्याची काळजी घेतात. बजरंगही त्यांच्या सहवासात आनंदाने रमतो. त्याच्या खोडकर हालचाली आणि निरागस वागण्यामुळे घरात नेहमीच आनंदाचे वातावरण असतं.
स्वार्थाच्या युगात माणुसकी हरवत चालल्याची चर्चा होत असताना, वैष्णोरा गावातील ठाकरे कुटुंबाने एका मुक्या जीवाला दिलेला आधार आणि प्रेम समाजासमोर संवेदनशीलतेचा आदर्श ठेवणारे आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे हे नाते अनेकांच्या मनाला स्पर्शून जाणारे ठरतंय.




Leave a Reply